सोमवार, १८ सप्टेंबर, २०१७

Monsoon

Monsoon ....it just started again and changed entire mood nature and human mind . This season is just amazing because it changes within few seconds the whole world in beautiful manner... nature with  entire green carpet ... plants with variety of green colors and its shades  .... proving once again that nature is best painter . Each and everything is showing freshness ....raindrops are just appearing like shining pearls under the sunlight, making morning sweet and shiny ... at the evening ,rain makes atmosphere emotional , romantic and crazy....makes you to cheer up and chill out ...!!Happy Monsoon ....!!! I just love this crazy romantic monsoooooooon !!

शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०१७

आठवण

काय असते आठवण..?? मनातली साठवण...
पावसाची सर...ओलाचिंब स्वर...
झोम्बणारा वारा .. अंगावर शहारा ....
वळवाच्या गारा ... छेडलेल्या तारा...
रातराणी धुन्द ... मातीचा सुगंध...
आभाळाचे रंग... भावनांचे तरंग...
हरवलेल्या वाटा ... रुतलेला काटा...
सुखाचा आधार ... दुःखातील भार...
क्षणांचा मेळ ... आयुष्यातील खेळ ...
रिते रिते मन ... अस्वस्थ अवघडलेपण ...
न तुटलेले बंध ...प्रेमाचे अनुबंध...
कुंद कुंद मेघ ...  अवघडत पुसलेली रेघ... 

सरीवर सर

सरीवर सर पावसाचा जोर
थेंबाथेंबासवे नाचे आनंदाचा मोर

मन तरल तरल ,काय क्षणात बदल ...!!!
आठवणींतूनी कोणी स्मरलं स्मरलं ....!!!

रान झालं ओलं ओलं हिरव्या रंगानी सजलं....
थेंबाथेंबांच्या स्पर्शाने अंग भिजलं भिजलं ....!!!

आली पावसाची सर माझ्या मनात मावेना...!!
ओल्या मातीची नाही कशाशी तुलना...!!

अशी पावसाची सर जावी मनात जिरून
धुंद मातीचा हा गंध उरे श्वासात भरून....

पावसाने दिला नवा गंध, नवा रंग
सारी चराचर सृष्टी झाली त्याच्यासवे दंग

नवा अंकुर पालव , शहारले पान पान
मनामनात जागले खोडकर बालपण...!!!



रविवार, २३ जुलै, २०१७

आजचा लोकसत्ता वाचताना एका अतिशय महत्त्वाच्या आणि अतिशय निराशाजनक बातमीने माझ्यासमोर असंख्य विद्यार्थी आणि त्यांच्या भवितव्याचा विचार मनात आला... मुंबई विद्यापीठ हे अतिशय नावाजलेले आणि जागतिक दर्जा प्राप्त असलेले, एक शैक्षणिक उपक्रम राबवणारे विद्यापीठ म्हणून प्रसिद्ध ...NAAC कडून 'अ ' दर्जा प्राप्त असणारे विद्यापीठ....!!!  पण गेले काही दिवस मुंबई विद्यापीठाच्या अनेक गोंधळांमुळे एकूणच त्याची झालेली दयनीय परिस्थिती पाहता मला हा लेख लिहावासा वाटला ... या सर्व गोंधळातून अनेक  प्रश्न मनात आले , ज्यांची उत्तर शोधून सापडतील असे वाटत नाही.
            आजची बातमी " चार दिवस महाविद्यालये बंद....!!! " '' शिकवा नंतर; आधी वेळेत मूल्यांकन.... विद्यापीठाचा प्राध्यापकांवर रेटा '' 
                 मुंबई विद्यापीठाच्या तिसऱ्या वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांचे जीव सध्या टांगणीला लागलेले असावेत... कारण अजूनही त्यांचे निकाल जाहीर झालेले नाहीत... विद्यापीठाने ह्या वर्षी online पद्धतीने उत्तरपत्रिका तपासण्याचा घाट घातला होता. online पद्धतीने निकाल लवकर लावला जाईल असा विश्वास कुलगुरूंना वाटत होता परंतु झाले उलटेच..!!! त्याचा परिणाम आज असा दिसत आहे की दिलेल्या मुदतीत निकाल लागणे अशक्य झाले आहे... नागपूर सारख्या विद्यापीठाची मदत घेण्याबाबतही विचार झाला असल्याचे बातमीमधून कळले परंतु तरीसुद्धा निकाल दिलेल्या तारखेला (३१ जुलै ) लावणे अशक्य दिसत आहे. त्यामुळे आता मुंबई विद्यापीठाच्या सुपीक डोक्यातून एक नवी कल्पना निघाली आहे. महाविद्यालयांना चार दिवस अध्ययन सुट्टी देण्यात आलेली आहे. प्राध्यापकांना  आपल्या महाविद्यालयामधील अध्यापन  सोडून उत्तरपत्रिका तपासण्यासाठी 'सोमवार ते गुरुवार' म्हणजेच (२४ जुलै ते  २७ जुलै ) असे चार दिवस ही सुट्टी दिलेली आहे . परंतु तरीही निकाल वेळेत लागणार का? हा प्रश्न राहतोच...!! 
                     शैक्षणिक सत्रांवर  या सर्व गोंधळामुळे नक्कीच परिणाम होणार आहे. एक तर निकाल उशिरा लागल्याने पुढील उच्च पदवी अभ्यासक्रमाचे वेळापत्रक तर बदलेलच: परंतु सध्याच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम सुद्धा सूत्रानुसार होणार का??? हा आणखी एक मुद्दा उपस्थित होत आहे. शैक्षणिक क्षेत्रात नव्याने काही गोष्टी करण्याचा  उपक्रम  अतिशय स्तुत्य आहे; परंतु तो सुरु करताना ' त्याचे होणारे दूरगामी परिणाम आपण लक्षात घेतले पाहिजेत' हा साधा सरळ विचार आपल्या कुलगुरूंनी आणि त्यांच्या समितीने करणे गरजेचे होते असे मला वाटते. मुंबई विद्यापीठात तृतीय वर्षाचेअसणारे एकूण  विद्यार्थी आणि प्रत्येक  विषयावर असणारी त्यांची एकूण संख्या, त्यानुसार एकूण उपलब्ध असणारी प्राध्यापकांची संख्या ह्या सगळ्याचा एक ताळमेळ लक्षात घेणे गरजेचे होते. offline आणि online पद्धतीने मुल्याकंन करताना किती वेळ लागतो, किंवा किती वेळ लागू शकतो ह्याचा तुलनात्मक विचार करणं गरजेचं होतं आणि आहे. त्यानुसार एखाद्या विषयाचे विद्यार्थी; ज्यांची संख्या कमी आहे अशा विषयाच्या उत्तरपत्रिका प्रायोगिक तत्त्वावर online पद्धतीने मुल्यांकित करून पाहणे गरजेचे होते. यातून एक उत्तरपत्रिका  online पद्धतीने  मूल्यांकन करण्यासाठी साधारण किती वेळ लागतो ह्याचा अंदाज आला असता. तसेच प्रत्येक प्राध्यापकाला ठराविक उत्तरपत्रिका मूल्यांकन करून द्याव्या लागणार आहेत, परंतु आपल्याकडील तांत्रिक यंत्रणा तितकी पुरेशी आहे का? तितकी परिणामकारक आहे का?? ह्या सर्व गोष्टी सुद्धा लक्षात न घेतल्याने विद्यापीठाचा एकूणच असलेला ढिसाळ कारभार आणि कामाचा दर्जा कसा आहे हे दिसून आलेले आहे. अशा अनेक गोष्टी अनेक वेळा दुर्लक्षित केल्या जातात परंतु त्या दिसताना छोट्या असल्या तरी त्यांचा होणार परिणाम हा खूप मोठा असतो. आणि ह्या सर्वातून एक गोष्ट ठळकपणे जाणवली ती म्हणजे NAAC द्वारे केले जाणारे दर्जात्मक मुल्यांकन....!!!! 
                NAAC द्वारे दर पाच वर्षांनी विविध विद्यापीठे आणि त्यातील विविध महाविद्यालये यांचे मूल्यांकन केले जाते . हे मुल्यांकन विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थेच्या अभ्यासक्रम, सोयीसुविधा, संशोधन, विद्यार्थी संख्या आणि त्यांच्यासाठी तसेच प्राध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी केल्या जाणाऱ्या विविध सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने उपयुक्त उपक्रमांवर आधारित असते. परंतु अनेकदा असे दृष्टिपथास येते कि मूलभूत सोयी सुविधा नसतानाही अनेक विद्यापीठे आणि महाविद्यालयांना 'अ  ' दर्जा प्राप्त झालेला असतो. माझ्या वैयक्तिक अनुभवात अशी उदाहरणे मी जवळून पाहिली आहेत. कारण NAAC समिती सर्व गोष्टी कागदोपत्री पाहते. महाविद्यालयाच्या कामकाजाची पद्धत आणि एकूण प्रगती खरीच कागदोपत्री जशी दर्शवली आहे तशी आहे का? हे पाहणे गरजेचे आहे, परंतु अनेकदा विद्यापीठाच्या किंवा महाविद्यालयाच्या पूर्वपुण्याईवरून सध्य स्थितीतही त्या संस्थेस उत्तम दर्जा दिला जोडतो... हे कितपत योग्य आहे? त्यामुळे NAAC समिती सुद्धा खरचं काय मुल्यांकन करते आणि कोणत्या आधारावर करते हा एक प्रश्न पडतोच जेव्हा 'अ ' दर्जा असणाऱ्या मुंबई विद्यापीठाचा असा ढिसाळ कारभार दिसू लागतो तेव्हा...!!! त्यामुळे आता तरी आपण काही ठोस भूमिका घेत आपल्या शिक्षण संस्था, त्यांचे ढिसाळ आणि गलथान कारभार यांवर अपेक्षित बदल करणार का? आणि आपल्या अनेक भावी पिढ्यांचा होणारा शैक्षणिक बट्याबोळ थांबवणार का ??? 

बुधवार, १२ जुलै, २०१७

                                  तो नेहमी म्हणायचा तिला..." कशी ओळखतेस तू मला इतकं  चांगलं ?' माझ्या मनात काय चालू असतं ते तुला न सांगताच कसं काय कळत..?? खूपदा मला वाटतं की माझ्यापेक्षा तू मला जास्त चांगलं ओळखतेस...!! खरंय आणि ते..!! पण मला याचं नेहमी आश्चर्य वाटतं ...!!" ती फक्त हसायची आणि म्हणायची त्याला.. '' ज्याला आपण मनापासून आपलं मानतो, ज्याच्यावर आपण मनापासून खरं प्रेम करतो त्याला असचं मनापासून जाणू लागतो आपण... त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवतो आपण, त्याच्या वागण्यातल्या  बोलण्यातल्या काही खास लकबी नकळत आठवणीत राहू लागतात... आणि मग त्या व्यक्तीच्या मनातलं सगळं त्याच्या डोळ्यात पाहिलं की कळू लागतं ,कळलं का माझ्या वेडोबाला ...!!'' त्याला तिचं असं बोलणं ऐकत राहावंसं वाटायचं , तो म्हणायचा , '' काहीतरी जादू होते तू बोलू लागलीस की ,,,ऐकत राहावंसं वाटतं बोलणं  तुझं .. तुझे  बोलता बोलता होणारे हातवारे, चेहऱ्यावरचे भाव पहात बसावेसे वाटतात... तू बोलतेस , पण तुझ्या डोळ्यातून ते सगळं जास्त effectively पोचतं पटकन... छान आहेत तुझे बोलके डोळे...!!! टपोरे , brown रंगाचे , पाणीदार आणि खूप खूप बोलके...!! त्या डोळ्यांवरच फिदा झालो मी...!!''
                           त्याच्या अशा बोलण्यावर जीव ओवाळून टाकावासा वाटे तिला... कित्ती साधा आहे तो...!!! कधी कधी इतका साधेपणाने मनापासून बोलू लागला; की ती त्याला थांबवत नसे...कारण बोलता बोलता गोष्टी किती खरेपणाने तो मांडत असतो हे तिला कळत असे.. त्याच्या मनात येणारे असंख्य विचार तो तिच्याशी बोलत असे, कारण त्याला कायम वाटे की  तिच्याशी बोललो की आपल्याला काहीतरी वेगळं वाटत... मनातले अनेक विचार काहीवेळा आपल्याला भंडावून सोडतात तेव्हा तिच्याशी बोललं कि चुटकीसरशी गोष्टी sort out होऊ लागतात.. आपल्याला काहीतरी समाधानकारक उत्तर सापडेल आपल्या प्रश्नांसाठी किंवा आपल्याला होणार त्रास, वैताग  सगळं तिच्यासमोर मांडताना त्याला कधीच अवघडलेपण जाणवत नसे किंवा ' बोलू की  नको ' असं ही वाटत नसे; त्याला तिच्या सोबत सगळं share करताना उलट खूप छान वाटत असे, आपल्यासाठी असणारा एक मोठ्ठा सपोर्ट आहे ती...!! त्याच्या अनेक मैत्रिणी होत्या पण  ती मात्र खास  मैत्रीण होती. 'जिच्याशी कधीही काहीही share करू शकतो आपण' हा विश्वास होता त्याला...!! तो म्हणायचा तिला नेहमी " तुझ्याशी गप्पा मारताना मला काहीतरी वेगळं जाणवतं ... बाकीच्या मित्रमैत्रिणींशी बोलताना असं  कधीच काही जाणवत नाही.... अशी मैत्रीण आपल्याला लाभावी हेच माझं नशीब ....!!!! "
                  आज तर ती खूप खुश होती कारण आज ती फक्त त्याला भेटणार होती खूप खूप दिवसांनी... मधल्या काळात आपण परदेशी गेल्यावर आपल्या ह्या वेड्या मित्राचे सगळे प्रताप तिला ऐकायचे होते ... तो तसा  अधूनमधून online बोलायचा पण timing च्या घोळामुळे मग तितकं बोलणं किंवा mail पाठवणं हळूहळू कमी होऊ लागलं ... ती तिच्या research work मध्ये आणखी बुडून गेल्यावर तर चुकामुकच जास्त होऊ लागली phone आणि mail असून सुद्धा...!! तो ही नव्या business मध्ये settle होतं होता ... त्यामुळे मग contact करणं जरा आणखीनच अवघड झालं होता दोघांसाठी .... त्यामुळे आज भेटल्यावर कसा वेळ जाईल आणि वेळ पुरेल का बोलायला इतक्या वर्षांनी भेटल्यावर हेच तिला कळत नव्हतं ... !!
            तो भेटणार म्हणून ती जरा मुद्दामच छान दिसेल अशी तयार झाली... college मधली आपली image पूर्णपणे बदललेली आहे हे त्याला कळावं असा छानसा dress तिने घातला. चेहऱ्यावर हलकासा make up करून ती त्याला भेटायला निघाली... CCD मध्ये भेटायचं ठरलं होतं आणि मग मस्त dinner करून रात्री घरी परतायचं असा plan ठरला  होता त्या दोघांचा ....!!!
                ठरल्यानुसार ती आली CCD जवळ तर तो आधीच येऊन तिच्या स्वागतासाठी तयार होता ... तिला पाहून त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक जाणवली तिला लांबूनच...!! तिला हसू आलं आणि जाणवलं ' काहीच बदललेलं नाही आपल्या दोघांच्या नात्यात इतक्या वर्षात ... एकमेकांपासून लांब असूनही...!!! '
                            भेटताच क्षणी  त्यालाही असंच जाणवलं ... मधली वर्ष कधी गळून पडली हे कळलंच नाही त्या दोघांना ...एकमेकांशी जुजबी गप्पाटप्पा , college days , friends त्या दिवसातील मजा ...सगळं आठवून झालं आणि तिने त्याला विचारलं '' कोणी खास मैत्रीण  किंवा मैत्रिणीहून खास वाटणारी व्यक्ती भेटली कि नाही तुला...??'' त्याने तिच्याकडे पाहिलं आणि सांगितलं . " सापडली तर आहे पण तिला मी आवडतो की नाही हे अजून माहीत नाही ... पण लवकरच तिला याबद्दल विचारणार आहे...!!'' तिला खूप आनंद झाला हे ऐकून आणि ती म्हणाली, '' मग सांग की तिच्याबद्दल....!!"
                   त्याने तिला सांगायला सुरवात केली '' पहिल्यांदा मला  कळतंच नव्हतं की आपल्याला नक्की काय वाटत आहे... college मध्ये एकत्र असताना कायम तुझ्या  आसपास असण्याची नकळत सवय झाली होती... तू माझी best friends असल्याने कायम आपली जोडगोळी एकमेकांसोबत जास्त असायची....!!! पण नंतर तू वेगळ्या कॉलेज मध्ये गेलीस post graduation  करायला आणि मी admission घेतली  दुसऱ्याच college मध्ये कारण मला पहिल्यापासून मुख्य मुंबई ची craze होती... उत्साहात कॉलेज सुरु झालं आणि मग पहिल्या काही दिवसातच मला जाणवू लागलं की आपण काहीतरी हरवून बसलोय... something is missing .... मला कळतंच नव्हतं काही काळ की  काय miss होत आहे ते...!!! पण असं अनेकदा जाणवायचं की मित्रमैत्रिणींच्या गराड्यात असूनही आपण सगळं share नाही करत आहोत ....कुठेतरी सगळं असूनही काहीतरी कमी जाणवत असायचं.. सगळ्यात असूनही खूप एकटं एकटं वाटायचं ... त्यातच अचानक वडीलांचा accident होऊन त्यांचा मृत्यू झाल्यावर मग तर मला त्यांचा business सांभाळावा लागत होता. College करता करता ह्या सगळ्या गोष्टी करताना माझी कसरत होऊ लागली
 So शेवटी post graduation अर्ध्यावर सोडून पूर्णपणे सगळं लक्ष business वर concentrate केलं. पण तुला मी post graduation course करत नसल्याचं सांगू मात्र नाही शकलो.  त्या काळात तुझा हरप्रकारे मला support मिळाला ख-या मैत्रीचा,म्हणून आज मी असा धडधाकट दिसतो आहे. तेव्हा असं जाणवत गेलं की तुझा विचार मनात आला की उगाचच छान वाटू लागतं. तू जवळ नसलीस की बैचेन झाल्यागत होतं. तुझा फोन आला की काय बोलू अन् काय सांगू असं होऊ लागतं. पण तरी हे नक्की काय होत आहे हे मात्र कळत नव्हतं. त्याच खरं  कारण मला कळलं जेव्हा आपण सगळे मित्रमैत्रिणी एकत्र एका picnic साठी आपल्या एका mam सोबत गेलो होतो तेव्हा...!!!
                                     त्यावेळी आपण सगळेच खूप मस्तीच्या mood मध्ये  होतो कारण खूप दिवसांनी आपण सगळे भेटलो होतो. तू पण आली होतीस... मस्त गपा टप्पा मारत आपण सगळेच छान enjoy करत चाललो होतो. एकमेकांच्या colleges बाबत बोलत होतो, एकमेकांची चेष्टा मस्करी करत आपण अख्खा  दिवस धमाल केली... पण त्या दिवशी तुला असं खूप दिवसांनी माझ्यासमोर मी पाहत होतो... तू सगळ्यांशीच कित्ती छान हसत हसत गप्पा  मारत होतीस, मधेच madam शी काही अभ्यासाबाबत पण विचारणं चालू होतं तुझं ... त्या वेळी तू इतकी गोड दिसत होतीस की काही काळ मला फक्त तुझा तो चेहरा पहावासा वाटत होता...!!! जणू जगाचा पूर्ण विसर पडला होता मला... आणि त्याच एका क्षणाला आला कळून चुकलं कि मी काय miss करत होतो इतके दिवस...!! कळून चुकलं होता कि तुझ्याशिवाय आता जगण्याला काही अर्थ नाही...!!!  माझ्याही नकळत मी तुझ्यावर कधीतरी  प्रेम करायला लागलो होतो.....!!! तू काय जादू केली होतीस मला माहीत नाही.. पण त्या दिवसापासूनच तुला मी माझ्या आयुष्यात खूप वेगळं स्थान दिलं होतं ... खूप आपलं मानलं होतं  तुला ....!!! अगदी मनाच्या कप्प्यात जपायचं ठरवलं होतं तुला, तुझ्यासोबतच्या घालवलेल्या आणि भावी काळातल्या अनेक क्षणांना  ...!!! त्या दिवशी तुला त्या सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत असताना हे सगळं कसं सांगावं ते मात्र कळत नव्हतं , पण तुला  सांगितलं तर तुला ते आवडेल  की  तुला काय वाटेल ह्याच मात्र खूप tension आलं होतं...  कारण तुझ्या जगण्यात तुझी काही तत्त्व होती... प्रत्येक गोष्टीबाबत आणि नात्यांबाबत तू अतिशय स्पष्ट होतीस... तुला अनेकवेळा तुझ्या future plans बाबत बोलताना मी ऐकलं होतं. तुला खूप शिकायचं होतं ...मोठठं होताना सामाजिक गोष्टीतही तुला तितकाच interest होता आणि त्या तुला करायच्या होत्या ... शिक्षण क्षेत्रात आपल्याकडून काहीतरी चांगलं घडावं ह्यासाठी तुला काहीतरी करायचं  होतं....  त्यामुळे तुला मी हे सगळं  सांगितलं तर तुला काय वाटेल ह्या विचाराने मी जरा गप्प गप्प होतो...तुझ्याशी कधी बोलावं याचा विचार करत....कारण मी काय अभ्यासातील किडा नव्हतो किंवा माझा अभ्यासाशी तसा graduation झाल्यावरचं संबंध संपला होता. मी नंतर लगेचच company मध्ये लक्ष द्यायला सुरवात केली होती.   मग ठरवलं direct विचारण्यापेक्षा अधूनमधून chating  करता करता विचारू अंदाज आला की..!!! आणि त्या विचारात असतानाच मग खुश होऊन गेलो... त्या क्षणी  मला माझा असं काहीतरी गवसलं होतं ...जे मी इतके दिवस शोधत होतो पण मिळत नव्हतं ...त्या दिवशी ते मिळालं आणि माझं  मन अगदी कापसासारखं हवेत तरंगू लागलं.. तुझ्या विचारांच्या फुलांभोवती फुलपाखरू बनून बागडू लागलं होतं ....!! ''
                   तिला हे ऐकतानाच खूप मज्जा वाटत होती... तिला हसू येऊ लागलं होतं... '' कसा आहे हा...?? ह्याला आपल्या मनातलं जाणून घ्यायचं तर होतं पण आपल्याला विचारायचं कसं ही भीती पण वाटत होती...!!'' ती त्याला म्हणाली, '' तुझ्या त्या दिवशीच्या वागण्यातच मला जाणवलं होतं की काहीतरी घडलंय किंवा काहीतरी घडतंय ज्यामुळे तू माझ्याशी बोलताना अवघडून गेला होतास जरा... मला वाटलं होतं की  खूप दिवसांनी आपण भेटलोय सगळे त्यामुळे काय बोलावं असा प्रश्न तुला पडला आहे की काय...?, कारण, ' तू मला थोडासा घाबरायचास जरी आपण best friends  होतो तरी' हे मला चांगलंच माहित होतं....!! म्हणूनच मी फार काही खोदून विचारलं नाही तेव्हा, पण तेव्हाच तुझे डोळे मला खूप काही  सांगू लागले होते ...''
          त्याला तिने असं सांगितल्यावर नवल वाटलं ... तो म्हणाला , '' अच्छा , म्हणजे सबकुछ जानकर भी तुम अंजान बने थे ...!!! मला वाटलं की तुला असं काही अंदाज आला नसेल , कारण आला असता तर तू मला तिथल्या तिथे ओरडली असतीस... !!!'' तिला अगदी मनापासून हसू आलं ...तो असाच आहे अजूनही... तिला नवलही वाटलं आणि हसू देखील आलं ... रोमँटिकपणा अजूनही तसाच भरला आहे नसानसांत त्याच्या.. कॉलेज मध्ये होता तसाच आहे अजून तो... आपल्याला वाटलं होतं की सुधारले असतील महाराज , पण आमचे महाराज अजूनही romeo -juliet , हीर-रांझा सारखेच... प्रेमात गुंतलेले आणि हरवून गेलेले...!!"
           ती म्हणाली, " तू असा विचार करतोयस हे आधीच  माहीत होतं  रे मला  ..!!! तुझी हि सगळी चालू असलेली धडपड , आणि तुझ्या मनातली धडधड माझ्यापासून लपवायचा तुझा चालू असलेला प्रयत्न पाहून मला सगळं कळूनही मजा वाटत होती...मलाही तू मनापासून आवडू लागला होतास तुझ्या अशाच स्वभावामुळे... " जो भी है, खुल के कहो  और  जिओ ...!!!" बिनधास्त आणि कायम प्रत्येक क्षण मनापासून जगणाऱ्या तुझ्यासोबत मी देखील मनापासून भावी संसाराची स्वप्नं पहात होते... पण मी माझी म्हणून काही स्वप्नं पाहिली होती जी माझ्या career साठी महत्त्वाची होती. ती पूर्ण  करण्यासाठी मी धडपडत होते... ती पूर्ण होताहेत असा वाटू लागल्यावर मग काही काळ तुझ्यापासून दूर गेले... पण तुला मात्र कायम मनात जपलं अनेक आठवणींमधून... कामाच्या व्यापात भले तुझ्या phone calls किंवा mails ना मी reply नसेल दिला पण कधीतरी अगदी एकाकी वातावरणात आणि एकांतात आपल्या जुन्या गप्पा गोष्टी, photos ह्याचाच आधार होता मला... तुझ्या आणि माझ्या अनेक आठवणींचा खजिना माझ्या अवतीभवती मी जपला होता... कॉफी पिताना हटकून तुझी आठवण यायचीच रे... पाऊस आला की तू आठवायचास आणि आपल्या मुंबई मधल्या पावसाळ्यातल्या अनेक  छोट्या छोट्या trips , treks आठवायचे... कित्ती छान आठवणी आहेत आपल्या ...!!! तू नसूनही कायम माझ्या सोबत होतास माझ्या मनात, माझ्या प्रत्येक क्षणात ... I love you my dear , I really love you so much. ''
        त्याचा चेहरा आता अधिकच खुलला...!! मनावरचं ओझं एकदम हलकं झालं ... त्याला वाटलंही नव्हतं की तिला पण असंच वाटतं असेल आपल्यासारखं... 'आपण स्वप्नात तर नाही ना ' या विचाराने त्याने स्वतःलाच एक चिमटा काढला... आणि त्याचा विश्वास खरा ठरला...!! तो स्वप्नांत नव्हता...!! ती त्याच्यासमोर बसली होती आणि हे सगळं मनापासून सांगत होती... तिच्या डोळ्यात पाहताना त्याला आपल्या भविष्याची स्वप्न दिसू लागली... तीच आपल्यावर प्रेम आहे हे ऐकूनच तू खरंतरं वेडा झाला होता... त्याला काय बोलावं आणि कसं व्यक्त व्हावं हे कळेना... त्याने तिचा हात हातात घेतला , खरंतर propose करायची तयारी करून तो आला होता , पण त्या आधीच तिने त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं ...!!
         








बुधवार, १७ मे, २०१७

                      आज खूप दिवसांनी तो तिला भेटणार होता... गेले काही दिवस त्याच भेटणं तर झालंच  नव्हतं पण फोनाफोनी पण फारशी झालेली नव्हती... तिने फोन केला तरी तो '' कामात आहे, busy आहे नंतर बोलू '' असं काहीबाही सांगून तिच्याशी बोलणं टाळत होता किंवा कमी बोलत होता... पण आज त्यानेच तिला आपणहून फोन केला होता. आज संध्याकाळी तो तिला भेटणार होता , long drive करत तिच्यासोबत पूर्ण संध्याकाळ घालवून परत यायचा plan त्याने केला होता... तसं त्याने तिला कळवलं पण होतं ... she was so  happy ..!!! कारण खूप दिवसांनी आज दोघे एकमेकांना भेटणार होते.... मनसोक्त गप्पा मारणार होते... एकमेकांच्या हातात हात घेऊन भावी आयुष्याची गोड  स्वप्न रंगवणार होते... एकमेकांच्या कुशीत खूप वेळ शांतपणे राहणार होते... त्याला भेटायला जायचं असलं की ती कायमचं खुश होऊन जायची... त्याचा romantic स्वभाव... रोमँटिक बोलणं... style सगळंच तिला मनापासून आवडायचं ... तो होताच तसा.. वेड्यागत वागणारा पण अतिशय मनापासून तिच्यावर प्रेम करणारा... तिची काळजी घेणारा .... तिला सारखा phone किंवा message करून आपल्या असण्याची जाणीव करून देणारा... आपली आठवण काढायला लावणारा... !!!!
                     पण गेले काही दिवस मात्र त्याला अजिबात वेळेचं , काळाचं भान नव्हतं... office च्या एका project ची जबाबदारी आहे माझ्यावर असं त्याने तिला सांगितलं होतं , पण त्यामुळे त्याला तिच्याशी बोलायला पण वेळ मिळत नव्हता.... तिचा जीव मात्र वरखाली झालेला त्या दिवसात...!! त्याचा phone नाही. ...एक message सुद्धा नाही... phone केला तर साहेब busy ...!!!  तिला खूप वाईट वाटू लागलं होतं ... रोजच्या त्याच्या sms, calls ची सवय झाली होती... ' तासनतास बोलत ; चेष्टामस्करी करत किती गप्पा मारतो आपण ' हे आठवून तिला अधिकच त्रास होत होता ... आणि आता..??  सैरभैर होऊन गेली होती एकदम त्याच्या अशा वागण्याने ....!!! काय झालंय  हे काही कळत नव्हतं  कारण तो कितीही busy असला तरी तिला एखादा phone किंवा message करायचाच तो... !!! पण ह्यावेळी मात्र तिला उगाचंच काहीतरी चुकीचं घडतंय किंवा घडणार आहे अशी भीती वाटू लागली होती
                    पण आज त्याने फोन केल्यामुळे तिला बरं वाटलं होतं ... मनातल्या अनेक शंकाकुशंका दूर सारल्या गेल्या होत्या... त्याला इतक्या दिवसांनी भेटायचं म्हणून ती खूपच आनंदून  गेली होती... तिने मनोमन बजावलं स्वतःला " आज त्याच्यावर रागवायचं नाही तर त्याच्यासोबत खूप गप्पा मारायच्या ... त्याचा हात हातात घेऊन पुन्हा आपल्या प्रेमाचा वर्षाव त्याच्यावर करायचा ... त्याचा ताण, ऑफिस मधली tensions कमी करायचा प्रयत्न करायचा... त्याला खूप काही सांगायचं आहे आज आपल्याला... आणि आपल्यालाही त्याला खूप काही सांगून मन हलकं करायचं आहे ... " कधी एकदा संध्याकाळ होते आहे आणि आपण त्याला भेटतो आहोत असं होऊन गेलं तिला... !!!!
              .तिने जाणीवपूर्वक त्याला आवडतो तो dress घातला. नेहमीसारखी लांबसडक केसांची घट्ट वेणी घालून तिने त्यावर मोगऱ्याचा गजरा माळला ...' वेणीवर गजरा छान दिसतो तुला... ' हे त्याच वाक्य आठवून तिला खुद्कन स्वतःशीच हसू आलं ... !! चेहऱ्यावर फार make up न करता हलकासा पावडरचा हात फिरवून, डोळ्यात काजळ घालून ती तयार होऊन बाहेर पडली ... त्याला भेटायला...!!
                   ठरलेल्या ठिकाणी, वेळेच्या आधीच ती त्याला त्याची वाट पाहत असताना दिसली ...त्याने Car थांबवली आणि तिला हळूच आत बसायची खूण केली.. ती सुद्धा हलकेच दार उघडून आत बसली... त्याने तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहिलं ... त्याला तिचा तो हसरा  चेहरा पाहून खूप प्रसन्न वाटलं , तिच्या गजऱ्याच्या वासाने त्याला सगळा ताण हवेत विरून गेल्यागत वाटू लागलं....!!! ती मात्र बसल्या बसल्या त्याला लटक्या रागात बोलू लागली; " भेटला नाहीस म्हणून रागावले आहे.  किती आणि काय भीतीदायक विचार मनात येऊ लागले होते मनात " असं काहीबाही ती बोलू लागली... त्याला तिची अशी बडबड ऐकताना गंमत वाटत असे नेहमी..!! किती आणि काय सांगू असं होऊन जातं तिला नेहमी ...आणि आता तर खूप दिवसांनी आपण भेटतोय म्हंटल्यावर बाईसाहेब भरपूर गप्पा मारणार हे नक्की ...!!! ती काहीबाही सांगत राहिली college चे किस्से , मैत्रिणीच्या लग्नाची गंमत आणि  केलेली धमाल..... पण तो मात्र कुठल्यातरी विचारात आहे असं तिला जाणवलं. नेहमी सारखा तो हसत नाही की बोलत  नाही आहे ..  तो शांत वाटतोय खरा पण नेहमीसारखा वाटत नसल्याचं तिला जाणवलं ... तिने त्याला त्याबद्दल विचारलं सुद्धा पण तो '' काही नाही अगं , बोलू आपण  जवळ पोचलो की ... " असं म्हणाला... त्यामुळे मग तिने फार काही खोदून विचारलं नाही...
        कॅफे जवळ पोचेपर्यंत मग ती पण जरा शांतपणे बसली... मोकळ्या वाऱ्याचा आस्वाद घेत ती पण त्याच्या मनात काय आहे हे विचार करत बसली... शेवटी एकदा कॅफे आला आणि दोघेही coffee ची ऑर्डर देऊन एका टेबलजवळ स्थिरावले ... त्याने शांतपणे तिच्याशी बोलायला सुरवात केली, " ऋतू , तुझ्याशी काही दिवसांपासून मी नीट बोललो नाहीये... बोलायचं तर होतं पण कामाच्या व्यापात नीट बोलता येणं शक्य नाही झाला त्याबद्दल sorry. ..!! पण मला तुझ्याशी काही गोष्टी बोलायच्या आहेत... " त्याचं हे बोलणं  ऐकतानाच तिला जाणवलं की काहीतरी घडलयं  किंवा घडणार आहे ज्याची आपल्याला भीती वाटत होती तसंच काहीतरी... पण तरी तिने शांतपणे त्याच्या बोलण्याकडे  लक्ष द्यायला सुरवात केली...  तो थोडासा अवघडल्यागत वाटत होता पण तरी त्याने बोलायला सुरवात केली " आपण best friends आहोत आणि कायम राहूच गं ऋतू , पण आपलं आत्ताच नातं आपण इथेच थांबवूया ... म्हणजे आपण थोडासा वेळ घेऊयात... मला.... मला  वेळ हवाय आपल्या नात्यासाठी... please माझ्याबाबत गैरसमज नको करून घेऊस..  पण मला आता असं वाटतंय की मी इतक्यात आपल्या या नात्यासाठी तयार नाहीये पूर्णपणे... आपण आहोत गेले ४/५ वर्ष एकमेकांसोबत अगदी college पासून पण तरी.... ''  तिला कळून चुकलं होतं, की त्याचा निर्णय त्याने आधीच घेतला आहे. फक्त त्याला तो आपल्याला सांगायचा होता.. इतके दिवस त्याला हे सांगण्यासाठी वेळ हवा होता. आणि त्यासाठीच हा मधला काळ तो आपल्यापासून लांब होता... मनातून त्याची होणारी चलबिचल तिला त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती, पण तरीही त्याने तिला सगळं स्पष्टपणे सांगितलं , जे तो नेहमी करत आलाय... आणि आजही त्याने तेच केलंय... !!!
            तिला थोडावेळ काय बोलावं तेच कळेना...  तिने त्याच्याकडे पाहिलं ... त्याच्या डोळ्यात असणारं प्रेम तिला दिसत होतं पण तरीही ते डोळे कुठेतरी बैचेन आहेत... खूप काहीतरी जाणवलं त्याच्या डोळ्यातं  तिला... पण....  तिने डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला शांत केलं ... निदान तसा  प्रयत्न तरी केला... तिला त्याचा स्वभाव पूर्णपणे माहीत होता...  जेव्हा तो खूप frustrate होतो तेव्हा एका क्षणी तो एकदम असं  टोकाचं बोलतो देखील...!! किंवा खूप जबाबदाऱ्या येऊ लागल्या कि त्याला असं अचानक खूप वैतागवाणं होतं ... आणि मग तो त्यापासून काही काळ लांब जाऊ इच्छितो, पण आज त्याने अचानक असा निर्णय घेतला आहे हे कळल्यावर तिला काय बोलावं हा प्रश्न पडला.. तिने त्याला शांतपणे त्याच्या मनातलं बोलू द्यायचं ठरवलं... आणि त्याच्या निर्णयात आपण कुठेही ढवळाढवळ नाही करणार हे ही मनाशी ठरवलं... दाटून आलेल्या डोळ्यातलं पाणी हसत हसत लपवत  तिने त्याचा हात हातात घेतला, थोपटलं हलक्या हाताने... त्याला म्हणाली ती, " तू तुझा निर्णय घेतला आहेस... आणि तो मला सांगितलंस हे उत्तम केलंस... तुला हवाय ना वेळ तो तू घे... त्यानंतरही तुला जे वाटेल ते तू मोकळेपणाने सांग मला... मी कायम पहिले तुझी मैत्रीण आहे आणि  मग तुझी प्रेयसी... आणि माझ्यामते, कोणतंही नातं जेव्हा बनतं तेव्हा ते दोन्ही व्यक्तींच्या मनाच्या अलवार बंधातून जुळतं , ते नातं जेव्हा अशा एका निर्णायक क्षणी निभावणं अवघड वाटू लागतं तेव्हा ते नातं तिथेच थांबवणं जास्त योग्य आहे .. !! जबरदस्तीने जुळलेली नाती कधी टिकत नाहीत.म्हणूनच तुझ्या ह्या निर्णयामागे काहीतरी विचार असेल नाहीतर तू मला असं अचानक नातं थांबवावं किंवा तोडावं असं म्हणणारा नाहीस ....तुला कोणत्याही बंधनात मला ठेवायचं नाही... जे नातं आपल्यात आहे ते फक्त मैत्रीचं असेल यापुढे... !! '' ती स्वतःशीच हसली, आणि म्हणाली '' तुला खूप चांगलं ओळखते रे मी... अगदी मनापासून... कदाचित तुझ्यापेक्षाही जास्त..!! तू असा अचानक बोलेनासा झालास, किंवा काहीबाही कारणं देऊन बोलणं टाळू लागलास तेव्हाच मला जाणवलं की काहीतरी झालयं  जे तुला सांगताना त्रास होतोय पण सांगायचं आहे मला... !!! बरं झालं सांगितलंस ते... इतका ताण घेऊन इतके दिवस तू वावरत होतास आणि मला हि काहीच कळेना काय झालंय ते, त्यामुळे मला पण एक ताण आलाच होता... पण आज तो ताण आणि त्याचं कारण सगळंच कळलं आहे मला... " आता आपण जे बोलू ते फक्त मैत्रीच्या नात्याने हे मी मला समजावेंन आणि तुलाही  ते समजून घ्यावं लागेल... कदाचित सुरवातीला ते तसं बोलणं सुद्धा अवघड वाटू लागलं तर आपण काही काळ समजुतदारपणे एकमेकांशी काहीच contact  नको ठेवायला... ते अवघडलेपण आपल्या मैत्रीला नको disturb करायला... एवढीच आहे माझी इच्छा .."
                  तिच्या त्या बोलण्यातून त्याला जाणवलं ,' ती किती समजुदारपणे वागते कायम... ती अशी आहे म्हणूनच आवडली आपल्याला खूप मनापासून... पण मग तिच्या इतकं समजूतदारपणे आपल्याला वागत येईल का हाच विचार मनात येत राहतो... ती आपली मैत्रीण आहे अगदी जवळची, हक्काची....!  जिला काहीही आणि कधीही सांगत येतात कुठल्याही गोष्टी... !!! " त्याने तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, ''Thanks ऋतू ''
                      तिला मात्र इतका वेळ लपवलेले अश्रू थोपवणं अवघड झालं होतं... पण त्याच्यासमोर आपल्या डोळ्यातून पाणी येता कामा नये हे बजावलं तिने स्वतःला... गळ्याशी दाटून आलेला आवंढा तिने मोठ्या मुश्किलीने थोपवला... एव्हाना गरमागरम coffee वेटरने टेबलवर आणून ठेवली. coffee  घेता घेता तिच्या मनात अनेक विचारांची दाटी झाली... " आपण काय imagine केलं होतं आणि आपल्यासमोर काय आलं हे एकदम अचानक.. ??? सगळ्याच गोष्टी एकदम बदलल्या आहेत आता... आपल्या प्रेमाच्या नात्याचा हा स्वल्पविराम की पूर्णविराम असेल... ??? खूप गुंतागुंत आहे आपल्या नात्याची... ती आता सोडवायची कशी एकदम...???  त्याने सोडवायला सुरवात केली आहे पण... मग आपण काय करायचं ?? त्याचा गुंता नाही होऊ द्यायचा ... जे जुळलंय ते दोघांच्या संमतीने.... आणि तितकंच उत्कटपणे ...!!! त्यामुळे ते इतक्या सहज तुटणार नाही हे नक्की... पण आता त्याला त्याचा श्वास मोकळेपणाने घेऊ देत... त्याला त्याच्या असण्याची जाणीव  होऊ देत... तोपर्यंत आपण त्याच्यासोबत त्याची सच्ची मैत्रीण म्हणूनच राहू..."'  तिला मात्र आता त्याच्यासमोर जरा अवघड झाल्यागत झालं, कधी एकदा घरी जातोय असं वाटू लागलं तिला.. ती त्याला म्हणाली , " जाऊयात का आता घरी .. शांत झालास का तू? आपण वाटलं तर थोडावेळ इथेच वारा खात बसू शांत वाटेपर्यंत ...." तो म्हणाला , '' नको . आपण जाऊ हळूहळू परत.. तुला उशीर नको व्हायला घरी पोचायला... चल निघुयातच आता... '' ती सुद्धा लगेचच निघाली.... गाडीत बसल्यावर त्याने  हळू आवाजात रेडिओ सुरु केला.. तिचं आवडतं गाणं लागलं होतं ..."ये दूरिया... इन राहों की दूरिया ...  कभी हुआ ये भी.. खाली राहों पें भी तू था मेरे साथ... कभी तुझे मिलके लौटा मेरा दिल भी खाली खाली हाथ...'' तिला वाटलं हाही योगायोगच का??? तिच्या मनातल्या अनेक भावना त्या गाण्याच्या शब्दाशब्दातून  व्यक्त होत होत्या... संध्याकाळच्या त्या कातरक्षणी आपल्या मनाला साद घालणारं ते गाणं ऐकता ऐकता ती शांत होत गेली... !! 
   















गुरुवार, २ मार्च, २०१७

पाऊस

                           त्या दिवशी चिंब पावसात भिजताना तिला तो आठवलाच.... मुंबईच्या college मध्ये नुकतीच ती रुजू झाली होती तेव्हाची गोष्ट...!! संध्याकाळच्या वेळी ढग जमा झालेले पाहून तिने जितक्या लवकर practical संपवता येईल तितक्या लवकर संपवलं आणि विद्यार्थ्यांना घरी वेळेत जा सांगून ती सुद्धा निघालीच... कारण मुंबईचा पाऊस बेभरवशाचा असतो हे माहित होतं तिला  ... कधी रिपरिप , कधी धुवांधार किंवा कधी एखादी  सर येते आणि जातेही; नाहीतर कधी अचानक रौद्र रूप धारण करणारा पाऊस तिच्या चांगल्याच परिचयाचा  होता .. असा पाऊस सुरु झाला की traffic jam , Trains बंद  किंवा काहीबाही problems trains चे... म्हणून वेळेत घरी पोचायला हवं ह्या विचाराने तिची पावलं जरा झपाझप पडू लागली... college मधून बाहेर पडताच क्षणी पावसाने जोरदार बरसायला सुरवात केलीच...!! ' जणू दबा धरून बसला होता की  काय आपण कधी बाहेर पडतोय हे पहात ....!!  ह्या विचाराने तिला थोडा वैताग आला आणि हसूही.... !! ''एका दृष्टीने बरंच झालं, निदान आपल्यासोबत कोणीतरी आहे ''  असा विचार आला तिच्या मनात... पावसासोबत ओल्या मातीचा सहज येणारा सुगंध श्वासात साठवत ती निघाली. हा मातीचा सुगंध कायमच तिला आवडत असे. 
                     तिने सहज आकाशाकडे पाहिलं. एरवी निळ्या रंगाचं असणारं आकाश आज काळ्या रंगाच्या अनेकविध छटांनी भरून गेलं होतं... दूरदूरवर फक्त काळ्या रंगाचे ढग दिसत होते तिला.  'काळ्या रंगाच्या इतक्या छटा असू शकतात...!!!!! ' हे तिला आज प्रकर्षाने  जाणवलं... काळे ढग आज तिला इतके सुंदर भासले की नकळत तिच्या मनात आलं, "काळा रंग.. कायम उदास आणि केविलवाणा, नैराश्याच्या जाणीवा जागृत करणारा...!!  समाजाने काळ्या रंगाला कायम दुय्यम  मानलं आहे पण हाच काळा रंग आपल्यासाठी वरदान आहे हे कोणाला कधीतरी  जाणवत असेल का ?? काळ्या रंगाचा वापर आपण कुठल्याही शुभ प्रसंगी करत नाही कधीच, पण आज या काळ्या रंगात कुठेही निराशा नाही, केविलवाणा सूर नाही तर चैतन्याचा धबधबा आहे दडलेला....शुभशकुन देणारा !!!"
              पावसाने सगळं रूपच पालटून गेलं  होतं... झाडांच्या पानांची होणारी हालचाल.. पावसाच्या थेंबांचा होणार आवाज ... पावसासोबत येणारा  गार वारा ... हवेत आलेला ताजेपणा.. आणि त्यासोबत अचानक आलेल्या जोरदार सरीने सगळ्यांची केलेली त्रेधा तिरपीट पाहत पाहत ती रस्त्याने जात होती... खरतरं taxi मिळाली असती तर लवकर station ला पोचता आलं असतं ही... !! पण आजच्या या पावसाने तिच्या मनाला वेगळीच भुरळ पडल्यागत झालं. दिवसभराचा ताण आणि कंटाळा त्या पावसात कुठे गायब झाला ते तिलाच कळलं  नाही. आणि म्हणूनच ' या पावसात मस्त भिजत जाऊ...!!" असा विचार करून ती एकटीच मुख्य रस्त्यावरून जात होती. 
                        आसपासच्या सगळ्याच भागात पाणी हळूहळू जमा होऊ लागलं होतं. छोटी मुलं आपल्या schoolbags सांभाळत उड्या मारत  त्या पाण्यातून खेळत  चाललेली तिला दिसली... कोणी छत्री धरून, कोणी raincoat सावरत हळूहळू सावकाश जात होते... कोणी छत्री जवळ नसल्याने दुकानाच्या आडोशाला उभे राहत पाऊस थांबण्याची वाट पाहत होते...!! ती देखील  छत्री धरून रस्त्याने जात होती; पण पावसाने, त्या छत्रीचा काही फायदा होणार नाही हे सिद्ध करायचा  चंग बांधल्यागत जोरदार कोसळायला सुरवात केली..,, उलटा पालटा वारा त्या छत्रीचा निभाव आपल्यासमोर लागू देत नव्हता... शेवटी कंटाळून तिने छत्री बंद केली आणि त्या कोसळणाऱ्या पावसात चिंब भिजत ती चालू लागली...पाण्याच्या त्या स्पर्शाने तिला खूप छान वाटलं... आणि डोळे मिटून त्या पावसाच्या धारा अंगावर झेलताना अचानक तिला तो आठवला....!!!! 
      अशाच पावसात आपण पहिल्यांदा पाहिलं होतं त्याला college मध्ये . college चा पहिला दिवस होता आणि आपल्याला पावसामुळे उशीर झाला होता...धावतपळत पहिलं lecture कुठे चालू आहे तो वर्ग शोधण्यासाठी आपण लगबगीने कॉलेजच्या प्रांगणात आलो होतो.. नोटीस बोर्ड वर शोधाशोध करत आपण निघालो होतो, आणि तेव्हा तो college च्या प्रांगणातच अशाच मुसळधार पावसाचा मनसोक्त आनंद घेत भिजत होता.. आपल्या आजूबाजूला काय चालू आहे , कोण आहे याची पर्वा ना करता... He was enjoying every single moment at that time ....!!  
         त्याला पाऊस खूप आवडायचा.. आणि असा मुसळधार पाऊस तर खूपचं आवडायचा... अशा पावसात कायम भिजत जाण्याचा  हट्ट असायचा त्याचा...तो नेहमी  म्हणायचा, '' आता आहोत तो क्षण पूर्णपणे अनुभवायचा.. कदाचित परत असा क्षण आयुष्यात येईलच अशी guarantee नाही... so उगाच कशाला नाही म्हणायचं एखाद्या गोष्टीला.. आहे तर मस्त enjoy करावी ती त्या क्षणाला .."  कितीही समजवावं तरी काहीवेळा अगदी लहान मूलागत हट्ट करायचा तो.. त्याच्या डोळ्यात निष्पाप मुलासारखे भाव असायचे ... ते भावुक डोळे पाहून मग आपल्याला सुद्धा त्याचा तो हट्ट मोडवत नसे आणि आपणही त्याच्यासोबत असेच भिजत जात असू....नंतर होणारा  सर्दी आणि शिंकाचा त्रास मात्र तेव्हा डोक्यात अजिबात येत नसे....!! गप्पा, चेष्टा मस्करी करता करता आपण कधी एकमेकांशी नकळत खूप काही बोलू लागलो होतो हे तेव्हा कळलंच  नाही... College ची वर्ष संपली तेव्हा आपण एकमेकांना आयुष्याचा जोडीदार मानलं होतं.. तशा  आणाभाका ही  घेतल्या होत्या खऱ्या.. अशाच पावसात घेतल्या होत्या... !!! पण भविष्यात काय मांडून ठेवलाय हे थोडीचं  माहित होतं  आपल्याला...??
                 पावसाळ्यात भटकंती करताना त्याच्यासोबत घालवलेले असंख्य क्षण आठवले तिला...!! रस्त्यावर पडणाऱ्या टपोऱ्या थेंबांकडे पाहताना तिला आठवले त्याचे टपोरे डोळे... तिच्यासाठी आतुरलेले... तिच्यावरील  प्रेमाने वेडे झालेले...!!! असाच होता तो...आजही अगदी स्पष्ट आठवलं तो तिला... अचानक मनातलं काहीतरी हललं आणि काळ्या रंगाचं मळभ दाटून आलं.... !!! तोच काळा रंग... मनाच्या गाभाऱ्यात नैराश्याने भरून आलेला .. !! आणि बाहेर असणारा चैतन्याने ओथंबलेला... !!! 
                   त्याला इतक्या वर्षात आपण परत भेटलो नाही, पाहिलं सुद्धा नाही... Mumbai मध्ये असून सुद्धा आपण एकमेकांपासून किती दूर निघून गेलो.... ?? एकेकाळी इतके जवळ होतो एकमेकांच्या आणि आता कुठे शोधावं तरी सापडू नये असे दूर आहोत एकमेकांच्या ... ?? कदाचित आपणच पुन्हा त्याचा शोध नाही घेतला ... कदाचित त्याने घेतला असेलही पण आपणच आपला पत्ता लागू दिला नव्हता त्याला... तो पावसाच्या सरीसारखाच आयुष्यात आला आणि मुसळधार पावसासारखाच प्रेम बरसून  गेला... आपल्या प्रत्येक क्षणाला ओला सुगंध देऊन गेला..! 
         त्याच्या असण्याचा,त्याच्या हट्टाचा, त्याच्या हळुवार स्पर्शाचा, त्याच्या चुंबनाचा, त्याच्या मिठीचा भास आजही तितकाच स्पष्टपणे जाणवला तिला.. .. मनातल्या मनात किती जपलाय आपण त्याला आजही हे जाणवलं तिला... !! '' काय मजा आहे ना आयुष्याची..??. जवळ असणारी माणसं अचानक इतकी परकी होऊन जातात... ??''  तिच्या डोळ्यात त्याच्या आठवणींनी पाणी दाटून आलं. एक क्षण तिला वाटलं, '' त्यालाही आपण अशा पावसात आठवत असू का..?? त्याच्याही डोळ्यात आपल्या आठवणींनी पाणी येत असेल का..?? त्यालाही असा पाऊस आपल्या आठवणींनी छळत असेल का...?? ''
              एकमेकांच्या मनाचे रंग जाणणारे आपण , एकमेकांची भाषा बोलणारे आपण आज मौनव्रत घेतल्यागत असे गप्प कसे झालो, याच नवल वाटलं तिला.... अचानक एकदम गळून गेल्यागत झालं तिला.. जो पाऊस मगाशी तिला आवडू लागला होता त्याच पावसाने तिला एकदम एकटं एकटं करून टाकलं होतं ... आता तर तिच्या डोळ्यातही पाऊस दाटून आला होता.. तसाच तितकाच मुसळधारपणे कोसळणारा... त्याच्या आठवणींचा... !!!









शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०१७

आयुष्य म्हणजे

आयुष्य म्हणजे नाही नुसती मजा...
आयुष्य म्हणजे चुकीसाठी सजा... 
आयुष्य म्हणजे नाही नुसता एखाद्याचा हेवा... 
आयुष्य म्हणजे जपलेल्या आठवणींचा ठेवा... 

आयुष्य म्हणजे नाही नुसता सुखाचा वारा ... 
आयुष्य म्हणजे कडू दुःखाच्या धारा... 
आयुष्य म्हणजे नाही नुसती स्वप्नील दुनिया... 
आयुष्य म्हणजे भूतकाळाची अदृश्य छाया... 

आयुष्य म्हणजे नाही नुसती जोडलेली नाती... 
आयुष्य म्हणजे सोडून गेलेले सोबती... 
आयुष्य म्हणजे नाही मोरपिसारा ... 
आयुष्य म्हणजे क्षणात तुटलेल्या तारा.. 

आयुष्य म्हणजे नाही नुसत्या सोबतीची आस... 
आयुष्य म्हणजे फक्त एकट्याचाच प्रवास.. 
आयुष्य म्हणजे नाही नुसता जल्लोषाचा क्षण.. 
आयुष्य म्हणजे हरपून गेलेले तन मन 

आयुष्य म्हणजे नाही नुसत्या स्वप्नांचा  ध्यास... 
आयुष्य म्हणजे वास्तवातला अटळ प्रवास... 
आयुष्य म्हणजे नाही फक्त मोजलेले श्वास.. 
आयुष्य म्हणजे जगण्यासाठी दिलेला आधाराचा हात ... 

असेच काही द्यावे घ्यावे

असेच काही द्यावे घ्यावे ; ऋणानुबंध हे हळुवार जपावे
सहवासाच्या वेलीवरती , प्रेमाचे हे फुल फुलावे...

असेच काही द्यावे घ्यावे, शब्दांविना ही भाव कळावे...
स्पर्शातुनी हलकेच क्षणांनी उमलत उमलत बहरून  यावे...

असेच काही द्यावे घ्यावे, तुझ्यामाझ्यातील अंतर मिटावे...
स्वप्नांना साकार करण्या उंच भरारीचे सामर्थ्य मिळावे...

असेच काही द्यावे घ्यावे , फुलपाखरापरी स्वछंद जगावे...
चंदनापरी झिजता झिजता , सुगंधातूंनी विरून उरावे...

असेच काही द्यावे घ्यावे, आनंदाचे क्षण वेचावे...
दुःख भयाच्या ओंजळीतून नैराश्याचे अर्घ्य द्यावे...

' तुझं ' आणि  ' माझं ' म्हणून , खरंच काही आहे का वेगळं ?
तुझ्या आणि माझ्या अस्तित्वातच सामावलेलं आहे सगळं...

तुझे आणि माझे , शब्द संवाद चर्चा आणि वाद...
तुझ्या माझ्या मनात , शेवटी आर्त प्रेमाचीच साद ....

तुझ्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा शोधताना या जगात..
शोधणारी प्रत्येक वाट शेवटी पोचली माझ्याच  मनात...

तुझ्या माझ्यात न बोचला कधी ' मी ' पणाचा काटा...
तुझ्या माझ्यामुळेच गवसल्या ' आपलेपणाच्या ' वाटा...



एक पाऊल

एक पाऊल तेजाचे...
मनातल्या ध्येयाचे.. 
एक पाऊल तेजाचे... 
स्वप्नातल्या क्षितिजाचे... 

एक पाऊल तेजाचे...
अंधारातल्या  प्रकाशाचे... 
एक पाऊल तेजाचे...
उजळलेल्या ज्योतीचे... 

एक पाऊल तेजाचे... 
अविचल निश्चयाचे...
एक पाऊल तेजाचे... 
जागलेल्या आत्मविश्वासाचे .... 

एक पाऊल तेजाचे... 
उमलणाऱ्या यौवनाचे ...
एक पाऊल तेजाचे... 
सळसळणाऱ्या उत्साहाचे.... 

एक पाऊल तेजाचे... 
आत्मनिर्भर प्रगतीचे... 
एक पाऊल तेजाचे... 
आकाशी झेप घेण्याचे... 

एक पाऊल तेजाचे... 
स्वप्नातल्या जगाचे... 
एक पाऊल तेजाचे.... 
वास्तवातल्या भानाचे 

गुरुवार, १९ जानेवारी, २०१७

                                       तो कधी तिच्या आयुष्याचा भाग झाला हे तिलाच आठवेना ...!! आज.. अचानक भेटला तो तिला... आणि भेटल्यावर तिला काय बोलावं हेच कळेना... कारण ज्या शेवटच्या क्षणी तिने त्याला पाहिलं होतं , ते त्याच्या लग्नात...!! त्याचं लग्न...! ठरलं ते पण इतकं अचानक कि तिलाच काय त्यालाही ते पचवणं खूप अवघड झालं होतं ....  कारण त्याच्या स्वतःच्या लग्नाचे खूप सारे plans  तिने ऐकले होते, त्याच्याकडून त्याच्यासारखेच hi fi style चे ... AC हॉल असेल.. भरपूर पाहुणे, मित्रमैत्रिणींचा गोतावळा आणि त्याच्या friend circle साठी वेगळी व्यवस्था .... खाणं पिणं  दोन्ही असणार ... दणक्यात party  असेल... असं आणि तसं...पण त्याचं लग्नच इतक्या घाईने ठरलं की या सगळ्या plans चा विचार म्हणजे एक स्वप्नचं राहिलं ...!! त्याची त्यावेळी झालेली स्थिती , सैरभैर  होऊन गेलेला तो , दोन्ही बाजूने पुरता अडकून गेलेला तो, कारण त्याच्या मनाविरुद्ध थोड्याश्या घाईने लग्न ठरवलं गेलं आणि तेही त्याला विशेष न पटलेल्या मुलीशी .... त्याची ती अस्वस्थ रूपं तिला आजही स्पष्ट आठवली... त्याची मानसिक तयारी नव्हती या लग्नाला.. त्याची त्याने रंगवलेली काही स्वप्न होती जी त्याला जगायची होती मुक्तपणे.... पण घडत असलेल्या गोष्टी वेगळ्याच होत्या .. त्या काळात आपण त्याला सोबत केली... धीर दिला आणि नव्याने होणाऱ्या बदलाचं स्वागत त्याने शांतपणे , धीराने करावं हा विश्वास दिला... आपल्या दुःखाला , त्याच्या समोर व्यक्तही होऊ दिलं नाही  ....!!! मात्र त्या दुःखाची तीव्रता कायम जाणवत रहाणार हे मात्र कळून चुकलं होतं तिला   ... लग्नाच्या दिवशीसुद्धा त्याच्यासोबत त्याची खास मैत्रीण म्हणून ती शेवटपर्यंत होती .... मात्र त्यानंतर त्याच्या आयुष्यातून कायमचं दूर निघून गेलो आपण... त्यानेही त्यानंतर वर्षभरात कधी आपल्याला phone किंवा message केल्याचं नाही आठवत तिला... नंतरच्या काळातही त्याचा आणि तिचा संबंध येण्याचा प्रश्न नव्हताच. मधल्या काळात अनेक गोष्टी घडल्या आणि त्यातली एक म्हणजे  तिचं  लग्नं ... लग्नानंतर ती मुंबई मधील उपशहरात राहायला गेल्यावर तर तिचा आणि त्याचा संपर्क होणं अवघडच होतं ... ती  सुद्धा  हळूहळू  आपल्या  संसारात रमू लागली... नव्या संसारात घर आणि नोकरी सांभाळत कसे दिवस जाऊ लागले  सुद्धा कळलं नव्हता... आणि आज अचानक भेटला तो तेव्हा तिला जाणवलं कि ह्याला आपण आजही मनात कुठेतरी तसंच  जपून ठेवलंय  की ...!!!
                               तिला वाटलेलं की तो विसरला आपल्याला ... रमला बहुदा संसारात त्याच्या .... !!!  ह्या विचाराने तिला आनंद आणि दुःख दोन्ही वाटत होतं ... आनंद यासाठी की तो त्याच्या संसारात  सुखी आहे , ज्या कारणासाठी त्याच्यापासून दूर व्हावं लागलं  त्याचा फायदा झाला आणि दुःख यासाठी की 'इतक्या पटकन तो विसरला सुद्धा आपल्याला???'
                               पण  आज अचानक त्याला समोर बघून तिला काय बोलावं हे कळेना... उलट तो अचानक असा भेटलाय  यावरच तिचा विश्वास बसेना ... अजूनही तसाच दिसतोय तो... डोळ्यात तेच मिश्किल भाव.. तीच hair style , सगळं तेच ... मात्र लग्न झाल्याने बोलण्यात आलेला थोडा समजूतदारपणा... तो बदललाय , पण पूर्णपणे नाही... बदल झालाय पण तो आतून, जणू घडलेल्या घटनांतून शहाणा झाल्यागत . तिला खूप बरं वाटलं . तो विचारपूर्वक वागतोय हे ही  जाणवलं तिला...!!!
                                त्याच्यासोबत hi hello गप्पा चालू झाल्या खऱ्या... खूप दिवसांनी भेटल्यावर एक विचित्र    अवघडलेपण आल्याचं जाणवलं  तिला... त्याला मात्र खूप काही बोलायचं होतं  हे जाणवत होतं ..... तो बोलता   बोलता  म्हणाला , ''सगळं आहे , पण तू मात्र जवळ नाहीस, फार वेगळं वाटतं तुझ्याशिवाय जगणं ''.... she was surprised ..... इतक्या वर्षांनी भेटल्यावर सुद्धा , पहिल्याच भेटीत त्याने मोकळेपणे सांगून टाकलं काय होतंय त्याच्या मनात... !!! त्याचा हाच  स्वभाव तिला आवडला होता. त्याचं  वागणं , बोलणं काहीवेळा इतकं साधं असायचं की तो नक्की हाच आहे ना ? असा विचार तिच्या मनात यायचा. आजही किती पटकन त्याने सांगितलं त्याच्या मनातलं , त्याच्या आयुष्यातलं एक खरं सत्य ...!!
                               तिला वाटलं, सांगावं का आपणही त्याला कि तुझ्याशिवाय मी कशी जगले.. जगत आहे ते...?   ज्यांचा  कधी विचार पण मनात आला नाही असे क्षण जगताना होणारी तगमग, त्रास, चिडचिड, हतबलता आपण कशी सहन केली आणि पुन्हा एकदा नव्याने आयुष्याची सुरवात केली.... त्याच्याशिवाय जगावं लागेल हा विचार सुद्धा  तिने मनात नव्हता आणला कधी... तो कायम सोबत होता तिच्या ...मनात, हृदयात खोल रुतून बसलेला...!   त्याच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण जणू आयुष्य देऊन गेला होता तिला... एक नवं आयुष्य ...!! त्या क्षणांचा गोडवा , त्या क्षणांची जादू आजही तिच्या मनावर होती... 'प्रेमाने सगळं जग बदलून जात' हे तिने ऐकलं होतं अनेकवेळा; पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव तिने त्याच्या प्रेमात पडल्यावर घेतला होता ... जणू स्वर्गलोकात असल्याचा भास तिला होत होता. त्याच्यासोबत घालवलेला प्रत्येकक्षण तिने जपून ठेवला होता.. त्या क्षणांनी तिच्या आयुष्यात किती सुंदर स्वप्न रंगवली होती... ती स्वप्न खरी होतील हा विश्वास होता तिचा , कारण स्वप्न दोघांनी मिळून पाहिली होती. मात्र  त्याने अचानक साथ सोडली अन, स्वप्न तशीच थिजून गेली.. तिला वाटलं, सांगावं ओरडून त्याला की किती रात्री आपण रडलो... किती दिवस आपण तळमळत काढले, मनाला कसं  सावरत राहिलो... उशीचा अभ्रा अन, रात्रभर रडून लाल झालेले आपले डोळे यांचा एक घट्ट नातं झालं होतं त्या काळात .. त्याच्या आठवणींनी जागवलेल्या रात्री तिला नकोशा होत असतं.. त्या काळी दिवस संपू लागला की एक अनामिक भीती तिच्या मनात दाटू लागे... कारण आठ तासांच्या त्या रात्रीच्या प्रहरी मनात होणारी कालवाकालव तिला जाणवत असे. अन  मग बैचेन करणारी ती  रात्र आणि रात्रीची शांतता तिला आणखीनच एकटी करून जात असे.... डोळे मिटले की डोळ्यांसमोर त्याच्यासोबत घालवलेले असंख्य क्षण नाचू लागत. त्या आठवणी तिचे काळीज चिरत असत ... पण त्याला कुठून कळणार हे सगळं??  जीवाची होणारी ती तगमग सहन करण्यापलीकडे आपल्या हातात काहीच नाही हे कटू सत्य मात्र तिला कळून चुकलं होतं . आणि हे सगळं आपण सांगण्याआधीचच त्याने एका वाक्यात सगळं सांगून पण  टाकलं.....!! तिला हसू आलं स्वतःचंच .... !! तसाच आहे तो अजूनही... नाही बदललाय... !!
                                तिने त्याला काहीही  न सांगण्याचं ठरवलं ... CCD  मध्ये AC असून सुद्धा तिला थोडा घाम फुटलाच.. त्याने सहज गप्पा मारता मारता सगळ्या friends ची चौकशी केली ..कोण कुठे आहे, तमका काय करतो, अमकी काय म्हणतेय, कोणाची लग्न झाली आणि कोणाला छोटा बच्चू आहे ... आणि मग म्हणाला तिला , ''तुझं  पण लग्न झालेले कळलं मला पण बोलावलं नाहीस तू  मला , तुझ्या लग्नाला... !!! तुझ्या best friend ला नाही वाटलं बोलवावंसं  तुला?"
                                 ती फक्त हसली थोडीशी.. कारण त्यालाही माहित होतं यामागचं कारण काय ते.. त्याच्या समोर  कोणा  दुसऱ्याला आपला नवरा मानून वरमाला घालणं तिला किती अवघड झालं असतं हे त्याला माहित होता... कदाचित त्याला ते जाणवलं न मग तो सावरून बसला. इतर गोष्टी बोलू लागला...
                          तिला जाणवलं किती बदललो आपण... आपल्यातलं नातं ... ??? एके काळी एकमेकांसोबत मैत्रीपूर्ण नात्यातून नंतर एकमेकांचे भावी जोडीदार म्हणून एकत्र स्वप्न पाहत पाहत अचानक किती लांब गेलो एकमेकांच्या ....!! तासनतास गप्पा मारणारे , chating करणारे  आपण आज चाचपडतोय एकमेकांशी बोलायला .... इतकं अंतर निर्माण झालं या एक दोन  वर्षात .....??????????
                                  तो सांगत होता , घरी सध्या काय चालू असतं ... बायको बोलू पहाते  पण मलाच बोलावसं वाटत नाही फार... मग ऐकत राहतो शांतपणे.. समजूतदार रहायचा प्रयत्न करतो, पण कधी कधी तोल जाईल असं वाटू लागतं अन, मग तुझी खूप आठवण येते ... तू कशी समजावून सांगायचीस, तू कसा धीर द्यायचीस ... तू कसं मला समजून घेऊन माझा राग शांत करायचीस ... आणि मग खूप अस्वस्थ होऊन जातो मी....!!!
                      तिला ते ऐकून बरं वाटलं , तो आपल्याला विसरला नाही हे जाणवल्याने तिला समाधान वाटलं. त्याच्या बोलण्यातून तिला जाणवलं की आज त्याला कळतेय प्रेमाची किंमत ...  पैसा, गाडीबंगला, कपडेलत्ते यांच्यापेक्षाही आपल्यावर मनापासून प्रेम करणारं माणूस आपल्या जवळ असेल तर आपण खरे श्रीमंत असतो , हे त्याला आपण वेळोवेळी सांगायचो जे त्याला आता पटतंय ...!! उशिरा का होईना , त्याला ते पटलं हेच महत्वाचं वाटलं तिला..
                            त्याला मोकळेपणाने खूप काही बोलायचं आहे हे तिला जाणवलं. त्यामुळे त्याला या क्षणी थांबवणं अवघड आहे, पण थांबवावं लागणार होतं .... म्हणून तिने त्याला मधेच थांबवत सांगितलं, " आपण बोलू परत कधीतरी, आज जरा घाई आहे. घरी पाहुणे येणार आहेत. तो थोडा थबकला , पण लगेच सावरत म्हणाला ,''ठीक आहे ... तुझा contact number तर मिळाला आहेच... बघू परत कधी भेटता येतंय ते.... !! पण लवकरच भेटशील ना कधीतरी परत मला ??? खूप काही बोलायचंय तुझ्याशी .... "
                             त्याला होकार देऊन तिने काढता पाय घेतला आणि मागे न बघता ती पुढे चालत राहिली , पण तिला  जाणवलं की त्याची नजर अजूनही तिच्यावर खिळलेली आहे आणि तिच्यासोबतच पुढे चालली आहे... !!!
   
 


          

बुधवार, १८ जानेवारी, २०१७

निरोप

' निरोप घेणं ' किंवा ' निरोप देणं ' खरंच सोप्पं असतं का? निरोप देताना किंवा घेताना मग डोळे का पाणवतात? निघता निघता पाय मागे का घुटमळतात ? पुन्हा भेटण्याची इच्छा व्यक्त का होतात? खूप आवरून देखील आठवणी फितूर का होतात आणि मनाचा बांध का फुटतो?? किती अवघड वाटतं अशा वेळी??
      आपल्याच आवडत्या व्यक्तीचा निरोप कधीतरी नियती आपल्याला घ्यायला लावते, तर कधी आपलचं माणूस अचानकपणे आपल्यापासून इतकं दूरं जातं कीआपल्यालाच कळत नाही, काय झालं अन, कसं झालं ते?...त्या वेळी मनात निर्माण होणारी कंपनं .... मनाची तगमग... अवघडलेपण , सैरभैर झालेलं मन  आणि हतबल झालेले आपण... कधी कधी निरोप घेतलेल्या व्यक्ती त्यांच्या आठवणींचा निरोप मात्र घेऊ देत नाहीत मनाला.... अन, मग मनाची ती दोलायमान स्थिती सावरता सावरता कठीण होतं ...   ' या आठवणींचा , या व्यक्तीचा आपण निरोप घेतलाय आपण ' हे बजावून देखील मन मात्र पुन्हा पुन्हा त्याच आठवणीत गुंतत राहतं ... इतकी अवघड असते का निरोपाची वाट...???